Skip to main content

‘माऊली’ चा जागर !

दिनांक18 जुलै 2017
        अत्यंत साधी राहणी. उच्च विचार. पद अप्पर विभागीय आयुक्त. कुठलाही आविरभाव, गर्व मनाशी शिवलेला नाही. इर्षा, द्वेष आणि मत्सरही नाही. कृतीतही  दिसत नाही. प्रेमाने समजून सांगण्याची वृत्ती. प्रशासनात असूनही बरेचजण ‘माऊली’ संबोधतात. कार्यालयातच काम होतं, असं मुळीच नाही. तर ज्या ठिकाणी संधी मिळेल, मिळवता येईल तिथे काम सुरू. त्यातच अध्यात्माची गोडी. म्हणून कीर्तन, हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायणातूनही सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमावर जागृती करण्याचे कार्य औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातील अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड नेटाने पार पाडतात.

         जलयुक्त शिवार, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता अभियान, पाल्यांसाठी आवश्यक संस्कार, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांवर सातत्याने लेखन डॉ. विजयकुमार फड करतात. हेच विषय कीर्तनातूनही सांगतात. जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल तर पारंपरिक माध्यमे प्रभावशालीच. त्याचा पुरेपूर व सुयोग्य पद्धतीने अगदी सामान्यांहून सामान्यांच्या लक्षात येईल, अशाप्रकारे कीर्तनातून सरकारच्या योजना, लोकांचा आवश्यक सहभाग आपल्या वाणीतून मांडतात. सामाजिक जाणिवेची भान करून देतात. कर्तव्य, जबाबदारी हाच भक्तीमार्ग असल्याचे सांगतात. त्यांच्या वाणीला प्रतिसादही भरपूर मिळतो. मराठवाड्यासह राज्यात त्यांच्या कार्याचा उल्लेख आदराने आणि गौरवाने होतो. सर्व समाजासाठी प्रेरणादायी असेच ते आहेत. स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धकांसाठी तर ते गुरूच.  
             शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर कीर्तन करताना ते म्हणतात, एकाची आत्महत्या म्हणजे अनेकांची भावनिक, मानसिक हत्याच. आत्महत्येला अध्यात्मात कुठेच स्थान नाही. आत्महत्या हा अत्यंत चुकीचा आणि पापाचरणाचा मार्ग आहे. मृत्यू निसर्गाचा अधिकार आहे. त्याचा अधिकार वापरणे, हस्तक्षेप करणे म्हणजे महत्पापच. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. असायलाही हव्यात. तेच जीवन असते.  म्हणून त्यापासून दूर जावयाचे नसते. परिस्थितीशी दोन हात करावयाचे असतात. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतक-यांनी खंबीरपणे लढायलाच हवे. शासन शेतक-यांच्या मदतीसाठी योजना आणते. अंमलबजावणी करते. त्याचा लाभ घ्यायला हवा. आपल्या लेकरा-बाळांना चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न करणे हेही जीवनातील ध्येयच असायला हवे. म्हणून केवळ त्यांना चार-दोन शिकवण्या, मोठे महाविद्यालय, शाळा म्हणजे त्यांचे भविष्य नाही. तर आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर केलेल्या चांगल्या संस्कारांची शिकवणही पाल्याच्या आई-वडिलांनी देणेही तितकेच महत्त्वाचेच,असल्याचे ते सांगतात.

              शेतकरी आत्महत्या, स्त्री-भृणहत्या पापच. निसर्गाने दिलेला जन्म हसत-खेळत जगून समाजाच्या उपयोगी आणावा असंच त्यांचं म्हणणं. कन्या, पुत्र एकच असून त्यात भेदभाव करू नका असं आवर्जून सांगण्याचे कार्य ते करतात. पटवून सांगतात. समाजाला पटतंही, त्याचं कारण त्यांची अमोघ वाणी. अन् विवेक बुद्धीतून समाजहितासाठी केलेली शब्दांची मांडणी. नुसतीच मांडणी नाही तर त्यातून तळमळ दिसून येते. नाहीतर गल्लेलठ्ठ पगार परंतु संसारातच धन्यता मानणारेही आहेतच ना ! मात्र, डॉ. फड यांची कृती पुढे जाण्याचं बळ देते. समाजहिताची गोडी निर्माण करून देते. ते ‘पगारी नोकरी’ एवढ्या विचारावरच न थांबता, होईल त्या मार्गाने सातत्याने शासनाची सेवा करतात. सेवेतून जनजागृती करतात.
            डॉ. फड यांच्या कीर्तनातून  शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवारांतर्गत करावयाच्या कामाला तर गती मिळालीच. पण प्रत्येकाने या अभियानात योगदान नोंदविण्याचा आग्रह त्यांनी कीर्तनातून वारकऱ्यांवर बिंबवला.  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी देखील डॉ. फड यांच्या कीर्तनास उपस्थिती लावलेली आहे, हे विशेष. रोजगार, जॉब कार्ड, सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज, जलयुक्त शिवार अभियानातील सहभाग, मागेल त्याला शेततळे, स्वच्छता अभियान आदी महत्त्वांच्या विषयावर अभंगाच्या निरूपणातून डॉ. फड विचार मांडतात. मांडून थांबत नाहीत, तर कृतीतून दाखवूनही देतात. त्याचबरोबर युवा वर्गालाही प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने लेखणीतून ते करतात. स्पर्धा परीक्षेच्या अनेक मासिक, दैनिकातून त्यांचे विचार भावी  अधिकाऱ्यांना घडविण्याचे कार्यही करतात.
         पत्रकारिता विषयांतर्गत माहितीच्या अधिकारावर सखोल आणि अभ्यासपूर्ण संशोधन करून मिळविलेली डॉक्टरेट पदवी त्यांच्या शिकण्याच्या आणि समाज प्रबोधन, संशोधक वृत्तीचे उत्तम उदाहरणच. एवढ्या मोठ्या विभागातील कामाच्या व्यापातूनही तरूणांना लाजवेल अशी त्यांची काम करण्याची वृत्ती, समाजासाठीची धडपड, जनप्रबोधनाचे कार्य अतुलनीय असेच आहे. प्रशासनासह प्रशासनात येणा-या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही आदर्शवत असेच डॉ. फड यांचे व्यक्तीमत्त्व आहे.   
-         श्याम टरके,  
     माहिती सहाय्यक,
     माहिती केंद्र, औरंगाबाद.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)