Skip to main content

वारकऱ्यांचा मेळा, नाथ षष्ठीचा सोहळा!


नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता झाली. संत एकनाथांची महती वैष्णवांना आहेच. संत एकनाथांच्या कार्याची महती पुस्तकातून कळतेच, परंतु प्रत्यक्षातील अनुभूती त्याहून वेगळीच असते. यावेळीच्या नाथ षष्ठी सोहळ्याचा हा वृत्तांत…
औरंगाबादहून पैठणच्या दिशेने आम्ही दुपारी दोन वाजता निघालो. काही दिंड्या औरंगाबादच्या दिशेने परतत होत्या. साडेतीनच्या सुमारास पैठणमध्ये पोहोचलो. काही दिंड्या मंदिर परिसरात होत्या. यावेळी सर्वाधिक दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या होत्या. या दिंड्यातील वारकरी आपापल्या पालात दिसत होते. गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलेला होता. यांच्यातून वाट काढत नाथांच्या दर्शनासाठी थेट मंदिराच्या मंडपात आम्ही प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या  पुजाऱ्यांनी आम्हा सर्वांचं स्वागत केलं. नाथांचा प्रसाद देऊन शुभाशीर्वाद दिले. नाथांच्या थेट समाधी दर्शनाने आम्ही तर धन्य झालो. हा क्षण म्हणजे मौलिकच. त्याची तुलना कोणत्याही ऐश्वर्याशी होऊ शकत नाही. दर्शनानंतरची अनुभूती अवर्णनीयच.
सूर्यास्तानंतर कालाहंडी फोडण्यापूर्वी नाथांचे वंशज रघुनाथ बुवा महाराज गोसावी यांची पालखी मंदिरात येते. नाथांच्या समाधी मंदिरासमोर संत भानुदास… संत एकनाथ… ज्ञानबा… तुकाराम… असा गजर कानावर पडतो. पैठणमधील तीन दिवसांपासून जमलेले वैष्णव काल्याची हंडी फोडण्यासाठी आतूरतेने वाट पाहतात. अन् सुरू होतो… काला दहीहंडी फोडण्याचा उत्सव आणि नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचा ओघ मंदिराकडे सुरू होतो. दुपारी चारपासूनच भाविक मंदिराकडे येतात. मंदिर परिसर, मंदिराचा आतील भाग आणि बाहेरील भागात भाविक कालाष्टमीचा सोहळा डोळ्यात सामावून घेण्यासाठी आतूर असतात. श्रीक्षेत्र पंढरपूर पाठोपाठ राज्यातील सर्वात मोठी वारकऱ्यांची ही यात्रा.  सर्वांना सुख, समृद्धी, समाधान लाभावे यासाठी वारकरी इथे येतात.  षष्ठीला सुरू होणारा हा सोहळा अष्टमीला संपतो. तीन दिवसांत वारकरी हरिनामाचा गजर करतात. साक्षात श्रीकृष्णाने नाथांच्या वाड्यात पाणी भरले, अशी आख्यायिकाही आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने (श्रीखंड्या) भरलेल्या रांजणाला दरवर्षी भरण्यासाठीची परंपरा आजही नाथ वंशज जपतात. इमानेइतबारे पुढे नेतात.  
नाथषष्ठीचा हा सोहळा डोळ्यात भरून घेण्यासाठी वारकरी खेड्यापाड्यातून याठिकाणी येतात.  नाथषष्ठीचा सोहळा वारकऱ्यांना पुढे जाण्याचे बळ देतं. आलेल्या प्रत्येक भाविकाला याठिकाणी प्रसन्नचित्त प्राप्त करून देण्याचा कार्यही या सोहळ्यातून होतं. गोदाकाठचा परिसर, जायकवाडी धरण आणि वारकऱ्यांचा मेळा जणूकाही प्रति पंढरपूरच…
नाथ षष्ठीचा सोहळा पाहण्यासाठी, नाथांचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील, परदेशातील भाविकही याठिकाणी येतात. खरंच कालाष्टमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर होणारे मंदिरातील वातावरण चैतन्यदायीच असते. मनाला ते प्रसन्न करते. भक्तिभावात पावली खेळणारे वारकरी, टाळकरी, पखवाजवादक यांच्या उत्साहाने मन हर्षोल्लासित होते. तृप्त होतेच. कालाष्टमीच्या दिवशी नाथांचे तेरावे वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्याहस्ते कालाहंडी फोडण्यात येते. काल्याचा प्रसाद घेऊन वारकरी घरी परततात. त्यानंतर नाथषष्ठी सोहळ्याची सांगता होते. तीन दिवस या सोहळ्यात संत भानुदास… एकनाथ… यांचा गजर मानवाला आणि त्याच्या चित्ताला शांत करते. सोहळ्यातील वारकरी चैतन्यदायी होतोच अन् घरी परततो. म्हणून महत परंपरा असलेल्या नाथ षष्ठी सोहळ्यास संत अभ्यासक, संशोधक यांनी भेट द्यावीच.
                                                                  -       श्याम टरके, औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)