Skip to main content

शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बजाज पाणी संवर्धन प्रकल्प टप्पा 2 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
औरंगाबाद,दि.04 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ झाला असून कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे केले.





लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 262 कोटी रुपयांतून 1 लाख 50 हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्या उद्घाटन प्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲङ देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. निसर्गाने दुष्काळाची निर्मिती केलेली नाही. ती मानवनिर्मित आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी विविध विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करुन जलयुक्त शिवार अभियान ही योजना शासनाने राबविण्यास सुरूवात केली आहे. लोकसहभागातून या योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील तीन वर्षात 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून पीक पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी केवळ एकच पीक शेतकरी घेत आता तोच शेतकरी तीन-तीन पीकं घेत आहे. या योजनेत लोकसहभाग हादेखील महत्त्वपूर्ण ठरला आहे. लोकसहभागातून सुमारे 500 कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे. पूर्वी पब्लिक , प्रायव्हेट, पार्टनरशिप (PPP) असे मॉडेल होते. परंतू आता आम्ही ‘पब्लिक, प्रायव्हेट, पिपल्स, पार्टिसिपेशन’ हे मॉडेल सुरू केले आहे. या मॉडेलमध्ये लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. यापुढे जलसंधारणाच्या कामांसाठी एखाद्या समुहाने CSR निधीअंतर्गत 45 टक्के निधी गुंतविल्यास उर्वरित 55 टक्के निधी शासन गुंतविणार आहे. या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्याप्रमाणावर होऊन ग्रामविकास साधला जाणार आहे. मागील तीन वर्षांत 25 हजार गावे दुष्काळाने होरपळली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे त्यात टप्या-टप्याने घट झाली आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने केवळ दुष्काळमुक्ती हा उद्देश ठेवून कार्यास सुरूवात केली नसून त्यांनी रोजगार उपलब्धीवरही भर दिला असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

श्री. फडणवीस म्हणाले की, पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड योजने’संबंधी नुकताच इस्त्रायल बरोबर करार करण्यात आला आहे. ‘दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पा’च्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात सुमारे 50 टीएमसी एवढे पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही श्री फडणवीस म्हणाले.

नुकतेच गंगापूर तालुक्यातील लासूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरातील एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापुढील काळात 10 हजारांवर शस्त्रक्रिया मोफत स्वरुपात करण्यात येणार आहेत. याबद्दल आमदार प्रशांत बंब यांचे विशेष कौतुक करावसे वाटते असेही श्री. फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर लासूर स्टेशन येथे नवीन पोलिस ठाणे लवकरच सुरू करण्यात येईल आणि ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्यात येईल,असे श्री. फडणवीस म्हणाले. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिकदायित्वातून कार्य करत आहे. या संस्थेने हाती घेतलेल्या या कामात शासनाची सर्व यंत्रणा आपल्या पाठिशी असेल. या संस्थेच्या जलसंधारणाची कामे इतरांसाठी आदर्श ठरतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या लासूर स्टेशन येथे उड्डाणपुलाच्या केलेल्या मागणीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राज्यातील रेल्वे क्रॉसिंगवर 250 उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात नुकताच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी करार झाला आहे. त्याअंतर्गत लासुर स्टेशन येथील उड्डाणपुलाचेही काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जलयुक्त शिवार अभियान हे लोकचळवळ बनल्याचे सांगतांना कौशल्यविकास आणि लोकसहभागावार जनतेने भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. इतर देशांप्रमाणे आपणही कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दरवर्षी एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देणार असल्याचे घेाषित केले आहे. त्यामुळे कौशल्य शिक्षणावर प्रत्येकाने भर दिल्यास राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधली जाईल असेही ते म्हणाले. यावेळी मधुर बजाज, खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. त्रिपाठी यांनी केले. यावेळी संयोजकांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिमा भेट देऊन गौरव करण्यात आला. तर श्री. फडणवीस यांच्याहस्ते मधुर बजाज यांना सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)