Skip to main content

शरद पवारांवरील चव्हाण लिखित पुस्तकाचे प्रत्येकाने वाचन करावे-  डॉ. मनमोहन सिंग

        
     औरंगाबाद,दि.23- आदरणीय मित्र, उत्तम सहकारी, जगभरात कर्तृत्त्वाने राजकारणात ठसा उमटविणारे, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी पुढाकार घेणारे, देशासमोरील संकटे आदर्शवत पद्धतीने हाताळणारे  माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवन आणि कार्यावर आधारीत शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार : द ग्रेट इनिग्मा’ या चरित्रात्मक पुस्तकाचे सर्वांनी वाचन करायलाच हवे, असे प्रतिपादन माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आज केले. 
शहरातील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) च्या रुक्मिणी सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. सिंग बोलत होते. माजी कृषीमंत्री तथा पद्मविभूषण शरद पवार, पुस्तकाचे लेखक शेषराव चव्हाण, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विश्वस्त अंकुशराव कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, प्रतापराव बोराडे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. सिंग म्हणाले, औरंगाबादच्या ऐतिहासिक अशा नगरीत येऊन मला आनंद झाला. जुने मित्र शरद पवार यांच्या जीवन आणि कार्यावरील पुस्तकातून अनेक बाबी वाचकांच्या समोर येतील. शरद पवारांनी देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेले आहे. देशावर आलेल्या विविध संकटावर मात करत अत्यंत कुशलतेने त्यांनी सामोरे जाऊन परिस्थिती हाताळली. मग ती परिस्थिती मुंबई बॉम्बस्फोटासंदर्भातील असो वा लातूर जिल्ह्यातील भूकंपाशी संबंधित. चार वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शरद पवारांनी उत्तमरित्या देशाचे संरक्षण मंत्री, कृषीमंत्रीपदही सांभाळले. देशाला आवश्यक असलेल्या बदलात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रात वित्तमंत्री असताना पवार संरक्षण मंत्री होते. त्यावेळी देखील आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी अग्रक्रमाने पुढाकार घेतल्याचे, आवार्जून श्री. सिंग यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचा माझ्याबरोबरीचा वाटा असल्याचेही ते म्हणाले. शरद पवार यांच्या कृतीशील अशा विचारांतून देशामध्ये मोठ्याप्रमाणात आवश्यक असणारे परिवर्तन झाले. फार कमी राजकारणी औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देतात परंतु पवार यांनी औद्यौगिक विकासातही मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच आज महाराष्ट्र औद्यौगिक विकासात अग्रेसर असल्याचेही  श्री. सिंग यांनी सांगितले. शरद पवारांना उत्तम आरोग्य लाभो असे म्हणत पुढील वाटचालीसाठी देखील श्री. सिंग यांनी पवार यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
श्री. पवार यांनीदेखील जीवन चरित्रात्मक अशा या पुस्तकामागचा प्रवास यावेळी सांगितला.  50 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मराठवाड्याने मला आपले मानले, असे याठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते, असेही पवार म्हणाले. कै. यशवंतराव चव्हाण आणि कै. विनायकराव पाटील यांची सातत्याने साथ मिळाली. त्यांच्यामुळेच मला राजकारणात निवडणूक लढविण्याची संधी मिळाली, असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील व्यक्तीने उत्तम, दर्जेदार अशाप्रकारे पुस्तकाची निर्मिती करणे याचा खूप आनंद वाटतो. मराठवाड्याशी माझा ऋणानुबंध पुर्वीपासूनच आहे आणि तो कायमच राहणार,  असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.    
पुस्तकाचे लेखक चव्हाण यांनी या संदर्भग्रंथाचा सर्वांनाच उपयोग होणार आहे. संशोधक, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, अभ्यासक,तरुणांना यामधून प्रेरणाच मिळेल, असे यावेळी सांगितले. श्री.  मेहता यांनीही विचार मांडले.  
सुरवातीला डॉ. सिंग, श्री.  पवार यांचे कमलकिशोर कदम यांनी शाल, स्मृतीचिन्ह, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अंकुशराव कदम यांनी डॉ. अहमद, शेषराव चव्हाण यांचा सत्कार केला. त्यानंतर डॉ. सिंग यांच्याहस्ते ‘पद्मविभूषण शरद पवार: द ग्रेट इनिग्मा’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलकिशोर कदम यांनी केले. सूत्रसंचालन सारिका गाडेकर यांनी केले. आभार श्री. बोराडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व मान्यवर,साहित्यिक, लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती .
------*****------

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)