Skip to main content

दुधड झाले शेततळ्यांचे गाव


पावसाचं अनिश्चित प्रमाण. त्यातच कोरडवाहू शेती. परंतु शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मागेल त्याला शेततळे योजनेने शेतक-यांत नवचैतन्य आणलं. अन् पाण्यानं स्वयंपूर्ण झालं ते दुधड. इथं प्रत्येक शेतात शेततळं उभारलंय, अशीच स्थिती. त्यामुळं पीक पद्धतीत बदल झाला. नगदी पिकांचा शेतकरी आता विचार करू लागलेत. या गावातील बदलेल्या परिस्थितीबद्दल…

''मराठवाडा विभागाचा विकास करण्याचा ध्यास विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी घेतला आहे. विकासाचा भाग म्हणून  प्रत्येक अधिका-यांनी एक गाव दत्तक घ्यावे, असा त्यांनी प्रयोग केला. त्याचाच प्रत्यय म्हणून मागेल त्याला शेततळे योजना दुधड गावात यशस्वी झाली. शेतक-यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळे घ्यावीत. सरकारच्या पैशातून ते घ्यावयाचे असल्याने या योजनेचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा. दुधडमध्ये यंदा जवळपास 65 शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. इतर गावांनीही या गावाचा आदर्श घ्यावा. शेततळ्यांची निर्मिती केल्यास गावात जलसमृद्धी अवतरणारच''

- डॉ. विजयकुमार फड, 
अप्पर विभागीय आयुक्त, औरंगाबाद    




यशस्वी मॉडेल
औरंगाबाद तालुक्यातील दुधड. अवघ्या 25-30 किलोमीटर अंतरावर. लोकसंख्या दोन हजार 661. पूर्वी ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, डाळींब पिके याठिकाणी शेतकरी घेत. परंतु डाळिंबाला आवश्यक पाणी देणे त्यांना शक्य होत नव्हते. मात्र मागेल त्याला शेततळे योजनेने गावक-यांची चिंताच मिटवली. रोजगाराच्या नव्या वाटा निर्माण केल्या. दत्तक गावाचा कायापालट मागेल त्याला शेततळे योजनेतून झाला. योजनेचे यशस्वी मॉडेल म्हणून दुधड गावाकडे पाहायलाच हवे.

मदन चौधरी यांनी शेततळ्याच्या माध्यमातून फुल शेती केली आहे 
पीक पद्धतीत झाला बदल
शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दुधडच्या शेतक-यांनी घेतला. त्यांच्या शाश्वत उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा असाच हा निर्णय. यंदा पावसाचे प्रमाण दुधडमध्ये कमी झाल्याने गावातील लहुकी तलाव कोरडा पडलाय. 30 वर्षांपूर्वी दुधडमध्ये ऊसाची लागवड जोमात होत. परंतु कालांतराने शेतक-यांनी ऊसाकडून मोसंबीचा मार्ग स्वीकारला.  मोसंबीला भाव मिळत नसल्याने दुधडचे शेतकरी डाळिंबाकडे वळले. काहींनी फुलशेतीचा पर्याय निवडला. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले. परंतु शेतक-यांना तारलं ते मागेल त्याला शेततळे योजनेने असे येथील शेतकरी सांगतात. 
ध्यास विकासाचा…
विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी चला गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा घेऊ हे अभिनव अभियान विभागात राबविण्यास सुरूवात केली. यामध्ये दुधड गाव अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी दत्तक घेतले. त्यानंतर त्यांनी वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, जलयुक्त शिवार, महिला सबलीकरण, वैयक्तिक शौचालये, मागेल त्याला शेततळे योजनेबाबत गावक-यांना माहिती दिली. सरपंचांनी स्वत:च्या घरापासून वृक्ष लागवडीस सुरूवात केली. गावक-यांनीही शेततळ्याचे महत्त्व ओळखून योजनेचा लाभ घेतला.
शेततळ्यांचे महत्त्व, बारामाही पिके
 सरपंचांना गावकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची धडपड. शिवाय स्वत:कडेच आपले सरकार सेवा केंद्र असल्याने त्यांनी प्रत्येक गावकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांचा ऑनलाईन अर्ज भरून दिला, अन् मागेल त्याला शेततळे या शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यामुळं शेतकरी बारामाही पिकांचा विचार करू लागलेत. फुलशेती, फळबाग लागवडीकडेही ते वळलेत.
शेततळ्यांमध्ये औरंगाबाद विभाग अव्वल
यंदा या गावामध्ये 65 शेततळी निर्माण झाली. राज्यात औरंगाबाद विभागाने शेततळं निर्मितीत अव्वल स्थान मिळवलंय. मराठवाडा विभागात 24 ऑक्टोबर अखेर 20 हजार 270 शेततळी पूर्ण झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 6 हजार 27 शेततळ्यांची निर्मिती झाली. त्यापाठोपाठ जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर विभागातील जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
होय, आम्ही लाभार्थी
          शेततळ्याचं 50 हजारांचं अनुदान मिळालं. पूर्वी मार्चपर्यंतच शेतीला पाणी पुरत. उन्हाळ्यात शेततळ्यामुळे शेतातच पाणी राहणार असल्याने इतर पिकांचाही विचार येथील शेतकरी करायला लागलेत. पीक पद्धतीत बदल झाला आहे. पारंपरिक पिकांकडून आता आधुनिक शेती, उत्पादनांकडे वळलो आहोत, असे येथील शेतकरी किशोर चौधरी सांगतात.

लाभार्थी बाबासाहेब वानखरे 
 शेतकरी बाबासाहेब वानखरे म्हणतात, माझ्याकडे साडेचार एकर शेती आहे. त्यात आम्ही 25 बाय 25 आणि 32 फूट खोल असे शेततळे उभारले. आमच्या शेतात दोन विहिरी आहेत.  या विहिरीच्या पाण्यातून केवळ 12 दिवसांत शेततळे तुडुंब भरले आहे. आता तीन एकरामध्ये डाळिंबांची लागवड केली आहे. पूर्वी पिकांसाठी आम्हाला पाण्याची टंचाई भासत. परंतु आता शेततळ्यांमुळे पाण्याची चिंताच मिटली आहे. शासनाच्या 50 हजार रुपये अनुदानाचाही या शेततळ्यासाठी उपयोग झाला आहे. वार्षिक 15 लाख रूपयांचे उत्पन्न मी या शेततळ्यामुळे काढू शकतो, असा विश्वासही वानखरे यांना आहे.


लाभार्थी शिवसिंग घुसिंगे 
 55 वर्षीय शिवसिंग फुलसिंग घुसिंगे यांनी सांगितले, की शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून 20 ते 25 लाख रुपयांचे उत्पन्न होण्यास मदत होणार आहे. येथून पुढे आम्हाला शेततळ्याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे. डाळींब लागवडीसाठी ते अत्यंत म्हत्त्वाचेच आहे. आम्ही 25 बाय 25 मीटर आणि 32 फूट खोल अशा पद्धतीने शेततळे तयार केले आहे.

सरपंच घोडके 
सरपंच कल्याण घोडके म्हणतात, शेततळ्यामुळे गावाच्या विकासाला सुरूवात झाली. डाळिंब, पपई, फुलशेतीकडे शेतकरी वळला आहे. शासनाच्या 50 हजार रूपये अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. शेतकरी पारंपरिक पिकांकडून आधुनिक शेतीकडे वळल्याने गावाबरोबरच शेतक-यांचा विकास होण्यास मदत होत असल्याने आनंद वाटतो, असेही घोडके म्हणतात. मागेल त्याला शेततळे योजनेची माहिती ग्रामसभेतून मिळाल्याचे कृषी मित्र प्रभाकर काकडे सांगतात. शासनाची योजना मागेल त्याला शेततळे असली तरी गावक-यांच्या निर्धारातून शेत तिथं शेततळे करण्याचा गावक-यांनी निर्धार केला आहे.
                                        - श्याम टरके,
माहिती केंद्र, औरंगाबाद

मो. क्र. 9860078988  

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)