Skip to main content

पर्यटन व्यवसायात ‘गाईड’ होण्याची सुवर्णसंधी

 पर्यटन व्यवसायात ‘गाईड’ होण्याची सुवर्णसंधी




 टुरिस्ट गाईड व्यवसायात येण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई, नागपूर, औरंगाबाद व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 400 युवकांना उपलब्ध करून दिली आहे. दि. 10.09.2017 पर्यंतhttp://mtdc.mhpravesh.in या संकेत स्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे. या व्यवसायावर प्रकाश टाकणारा हा लेख
औरंगाबाद 52 दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिकसांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत दाखल होतात. इथल्या वास्तूकलांचा, इतिहासाचा अभ्यास करतात. संशोधन करतात. परंतु या सर्वांमध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावतात ते गाईड.
 ‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. या संस्कृतीच्या प्रतिमा निर्मितीचे महत्त्वपूर्ण असं कार्य ‘गाईड’ ला पार पाडावे लागते. पर्यटकांचा मित्र म्हणून आतिथ्यशील वर्तनाने त्यांना मदत करावी लागते. आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांसह पर्यटकांचा विश्वास संपादन करावा लागतो. गाइडच्या अंगी सौजन्यपूर्ण, सक्षम, चतूर, दयावन, क्षमाशील, समंजस असे गुणही असणे महत्वाचे असते. यातूनच आदरातिथ्याचे दर्शन घडते. त्याचबरोबर राज्य, देशातील घडामोडींवर बारकाईने, अचूक लक्ष ठेवून पर्यटकांना नवनवीन माहिती  देणे आवश्यक असते. इथल्या संस्कृती, परंपरा, लहेजा, सवयी समजून इतरांपर्यत सकारात्मक पैलू पोहचवावे लागतात. त्यामुळे स्थानिक – पर्यटकांमध्ये आदरभाव निर्माण होण्यास मदत होते. वेळेच  पालन, टापटीप राहणी, प्रामाणिकपणा, प्रसन्न वेशभूषा, सुसंस्कृत वर्तणूक, शांत स्वभाव कामाप्रती निष्ठा, असणेही गाईडसाठी अन् राज्य- देशासाठी महत्त्वाचे आहे. या निष्ठेतूनच देशाची प्रतिमा उंचावली, साकारली जाते. पर्यटक, आपला ग्राहक आहे. ग्राहक नेहमीच बरोबर असतो हे सूत्र मनात ठेवून त्यांच्याशी सौजन्याने वागावे. त्यांचा प्रवास समाधानकारक होण्यामध्ये गाईडची भूमिका मोलाचीच असते. पर्यटकांसाठी गाईडचे थेट संबंध येत असल्याने राज्य, देशाची प्रतिमा उंचावण्याचं कार्य जबाबदारीने ‘गाईड’ ला पार पाडावे लागते.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनही याकडे पाहता येईल. तसेच शहरे, पर्यटनस्थळी पूर्ण वेळ काम, पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांकडे रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
          गाईड होण्यासाठी 18 ते 60 वयोगाटातील स्थानिक रहिवासी असायला हवा. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर आणि अमरावतीतील रहिवाशांकरता पदवी, पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या शहरांव्यतिरिक्त प्रशिक्षणासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विदेशी भाषेचे ज्ञान असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र, यासाठी साक्षांकित प्रती सादर कराव्या लागतात. शारीरिकदृष्ट्या सक्षम, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबत अत्यंत उत्साही असल्यासच या व्यवसायाकडे वळणे मात्र उत्तम राहील.
 पर्यटकांसोबत उत्तम संवाद साधण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे. प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर महामंडळामार्फत नेमलेल्या संस्थेकडून शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर टुरिस्ट गाईड प्रमाणपत्र दिले जाते. जे की पाच वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर प्रमाणपत्राची वैधता संपुष्टात येण्याअगोदर गाईडला रिफ्रेशर कोर्स पूर्ण केल्यानंतरच वैधता वाढवून दिल्या जाते.
अशाप्रकारे ‘ टुरिस्ट गाईड’ व्यवसायात पर्यटकांची सेवा आणि समाधानातून रोजगारप्राप्ती करता येते. त्यामुळे इच्छुकांनी या व्यवसायाकडे संधी म्हणून बघितल्यास पर्यटन व्यवसायात वाढ होण्यास मदतच होईल.
                                                                       -  श्याम बालासाहेब टरके,
                                  माहिती सहाय्यक ,
                                          माहिती केंद्र, औरंगाबाद








Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)