Skip to main content

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’

विदर्भातील वाघांच्या सर्वाधिक अधिवासामुळे नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून प्रकाशझोतात आले आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पामुळे जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन याठिकाणी आपणाला घडते. पट्टेदार वाघ, हरिण, साळिंदर, नीलगाय, अस्वल, मोर आदी प्रकारचे वन्यप्राणी पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावतात. त्यांचे वनाचे उत्तम संवर्धन म्हणजे आपल्यासाठी पेंच प्रकल्प अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावीच, असाच हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प होय

      येथील डिसेंबर महिन्यातली गुलाबी थंडी आणि आजूबाजूचे पर्यटन पर्यटकांना भूरळ घालतातच. राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या नागपूर-अमरावती विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न, पर्यावरणप्रेमी संघटनांची साथ आणि सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे वन्यजीवांचे संवर्धन होत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघांचा अधिवास नागपूर-अमरावती विभागात आहे. त्यातही सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांइतकीच संख्या पेंच-सिल्लारी व्याघ्र प्रकल्पात आहे. नागपूरपासून अवघ्या 80 किमी असलेल्या या प्रकल्पात 257 चौ. किमी असलेले राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. जैवविविधतेने नटलेले विलोभनीय हिरवेगार डोंगर, तळे, दऱ्या-खोऱ्यातून वाहणारे पाणी, 33 प्रकारच्या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 164 प्रजातींचे विविध पक्षी, 50 हून अधिक प्रकारचे मासे, 10 प्रकारचे भू जलचर, 30 प्रजातींचे सरपटणारे प्राणी या राष्ट्रीय उद्यानात आहेत. विशेष म्हणजे निसर्ग सौंदर्य लाभलेले 24 पट्टेदार वाघही याच भागात अधिवास करतात. 
           वाघांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर वाघ ज्या भागात राहतात तेथील पर्यावरण उत्कृष्ट दर्जाचे मानले जाते. वाघ जैविक अन्नसाखळीतील प्रमुख घटक आहे. तृणभक्षी प्राण्यांची शिकार व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य वाघच करतात. त्यामुळे पेंच-सिल्लारी पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथील वाघांचे दर्शन व्हावे. त्यांची प्रतिमा, छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपता यावी यासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. मुक्काम करतात. काहींना पहिल्याच भेटीत येथील ‘वीरप्पन’, ‘प्रिन्स’ यांची छबी टिपता येते. तर काहींना थोडासा वेळ लागतो. परंतू इथे येऊन वाघांचे दर्शन झाल्यास अधिक आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळतो. तरीही इथला निसर्ग पर्यटकांना निराश न करता आपल्यातील विविध प्रजातींच्या वृक्ष, प्राण्यांनी पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी पुन्हा-पुन्हा खुणावतो.
          पर्यटकांना याठिकाणी विशेषत: सांबर, हरिण, चितळ, नीलगाय, माकडे, कोल्हा, जंगली कुत्रे-डुकरे, अस्वल, बिबट्या, साळिंदर पाहावयास मिळतात. त्याचबरोबर स्थलांतरित पक्षी, त्यामध्येही विविध प्रजाती याठिकाणी आढळतात. वृक्षांमध्ये बांबू गवत, साग, विविध बहुउपयोगी औषधी वनस्पती या ठिकाणी दिसतात. तर यामध्ये विशेष करुन उल्लेख करावा लागेल तो कऊच्या झाडांचा. दिसायला अतिशय सुंदर असणारे हे वृक्ष प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतेच. या सुंदर अशा वृक्षाला ‘घोस्ट ट्री’ असे इंग्रजीत संबोधतात. तर काहीजण त्याला ‘नेकेड ट्री’ असेही म्हणतात. या वृक्षामुळे जंगलातील सौंदर्यात मोलाची भर पडलेली आपणाला जाणवते. जणू हे वृक्ष प्रत्येकाचे आकर्षण आहेच, हे पर्यटकांच्या आकर्षणावरून लक्षात येते. 
        बखारी, सलामा, भूकंप रोड आदी ठिकाणांमध्ये ते पाहावयास मिळते. त्यानंतर बांबू वनातून सिल्लारी गेटकडे गेल्यानंतर शेवटच्या भागाला राज्यातील महत्त्वाचा असा जलसंपदा विभागाचा पेंच जलविद्युत प्रकल्प, तोतलाडोह पाहायलाच हवा. हे धरण 74.5 मीटर उंचीचे आहे. त्याची लांबी 680 मीटर आहे. 4273 चौ. किमी पाणलोट क्षेत्र असलेल्या या प्रकल्पातून 1532 द.ल.घ.मी. पाण्याची वार्षिक 40.5 कोटी युनिट निर्मिती होते. तर जलसंचयाच्या 1241 द.ल.घ.मी. पाणी वापरण्या योग्य असते, हे या प्रकल्पाला भेट दिल्यास समजते.
      जंगलात सफारी करण्यासाठी स्थानिक जिप्सी वाहन, योग्य व अचूक माहिती देण्यासाठी नाममात्र मानधनावर गाईडही याठिकाणी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रती मानसी 90 रुपये प्रवेशशुल्क सिल्लारी येथे आगमन झाल्यास वन विभागाच्या तिकीट खिडकीवर भरावे लागते. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळामार्फत खोल्यांची व्यवस्था आहे. सिल्लारी विश्रामगृहासाठी नागपूर विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाशी (0712-2524624) संपर्क साधता येतो.
        पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान जैवविविधता, निसर्गसौंदर्याचा अतिशय सुंदर मिलाप असलेल्या वन आणि वन्यजीव संवर्धनाचा अमूल्य असा ठेवाच आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी याठिकाणी भेट द्यायलाच हवी.

                                                                                                                   -   श्याम टरके, नागपूर

Comments

Popular posts from this blog

मनीषा दांडगेचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’

दिनांक:- 16-05-2017 लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी पदाची निवड 2013 मध्ये झाली. 2014 मध्ये पोस्टींग मिळाली. परंतु ‘ झोपडपट्टीतील तरूणी झाली उपजिल्हाधिकारी’   अशा आशयाचा मजकूर तरूणांना अजूनही फेसबुक, न्यूज वेब पोर्टल अन् व्हाटसअ्पव्दारे प्रेरित करत आहे. स्पर्धा परीक्षकांसाठी प्रेरणादायी अशीच चंद्रपूर जिल्ह्यातील मूलच्या उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांची यशकथा. व्हाटस्अप  आणि आई             व्हाटसअपवरील संदेश उपजिल्हाधिकारी झालेल्या मनीषा दांडगे यांच्या आईला आजही त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील तरूण वर्ग वाचून दाखवतात. तेव्हा आईला लेकीचा अभिमान अन् मिळविलेल्या पदाचा झालेला आनंद हा गगनात मावेनासा होतो. परिसरातील तरूण वर्गही झपाट्याने अभ्यास करून डोळ्यासमोर मनीषा दांडगे यांचा आदर्श ठेवून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणाचा ध्यास घेत आहे,  शिकत आहे, असे आई असलेल्या लक्ष्मी दांडगे अभिमानाने सांगतात. बुध्दिमत्तेची चुणूक             तसा हा परिसर म्हणजे झोपडपट्टी. औरंगाबादेतील जाधववाडी जवळील आंबेडकर नगर. मनीषा यांचे वडील मातीकाम करणारे (मिस्त्री). 34 वर्षापूर्वी ते जालना

भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त -नवल किशोर राम

दिनांक 31 जानेवारी 2018 औरंगाबाद,दि. 31   - भूसंपादन कायद्याबाबत सखोल माहिती होऊन योग्य आणि प्रभावीपणे कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी भूसंपादन प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण, उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा, पारदर्शकतेचा हक्क अधिनियमावर आधारीत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) मंजुषा मुथा आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेला सुरुवात झाली. कार्यशाळेत नवीन भूसंपादन अधिनियम 2013 कायद्यातील महत्त्वाच्या बाबी, भूसंपादन प्रस्ताव सादर करणे, सामाजिक परिणाम निर्धारण

नयनरम्‍य खिंडसी...

राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन नागपुरात पार पडलं. पाच दिवसाच्‍या या प्रदर्शनानंतर पर्यटनाची मजा लुटण्‍यासाठी आम्‍ही खिंडसीला गेलो. नागपूरपासून जवळच असलेलं हे खिंडसी. रामटेकच्‍या राम मंदिरानंतर पाहायला मिळतं. निसर्गरम्‍य अशा ठिकाणी सर्वच जण इथं येतात. अगदी चिमुकल्‍यांपासून ते वृद्धांपर्यंत. तरुणाईसाठी तर सांगायचं कामच नाही. मनाला भावणारं असं हे खिंडसी पर्यटन. या पर्यटनाची मजा लुटली ती आम्‍ही.... म्‍हणजे माझे मित्र चंद्रकांत पाटील , संग्राम इंगळे आणि निलेशने. खूपच सुखावणारा अनुभव होता तो. तरुणाई , शाळकरी मुलं-मुली , शिक्षक , नवदांपत्‍य आणि भरभरून असलेला निसर्ग... डोळे कसे तृप्‍त करून जातो , ही इथं आल्‍यावरच कळतं. जलसफर गोवा आणि मुंबईत केली परंतु इथली जलसफरही तितक्‍याच तोडीची आहे. याठिकाणी येणा-या पर्यटकांची राहण्‍याची सोयही उत्‍तम आहे. जेवणाचीही व्‍यवस्‍था आहे , अगदी मांसाहारापासून शाकाहारापर्यंत , तेही चविष्‍ट. उन्‍हाळयात तर याठिकाणी प्रत्‍येकाने भेट द्यायलाच हवी , असं हे नयनरम्‍य असं ठिकाण आहे.  (व्‍हीडिओ सौजन्‍यः चंद्रकांत पाटील)